बेळगाव : गत 64 वर्षांपासून आम्ही अन्यायविरोधात लढत आहोत. सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी 1 नोव्हेंबरला फेरी व सभा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोना असल्याने प्रशासनाने फेरीला नकार दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक अंतर राखत काळ्या दिनाची फेरी काढू व सभा घेऊ, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीने मांडले आहे. काळ्या दिनी सायकल फेरीला परवानगी मिळाली नाही, तर प्रत्येक घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन शहर व तालुका समितीने केले आहे. आगामी काळ्या दिनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा मंदिर येथे मध्यवर्ती समितीची बैठक मंगळवारी सायंकाळी पार पडली.
या बैठकीत काळ्या दिनाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच या दिनाच्या आचरणासाठी प्रशासनाकडून अनुमती देण्यात येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. 1 नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार्या काळ्या दिनास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काळा दिन पाळण्यास निर्बंध घातले आहेत. शिवाय मूक मोर्चालाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे धरणे आंदोलन छेडून आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकशाहीच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी आंदोलन छेडून सरकारचा निषेध करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, सुरेश राजूकर , रणजीत चव्हाण पाटील, प्रकाश मरगाळे, बी. डी. मोहनगेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
युवा समितीच्यावतीने गेली 3 वर्षे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी सीमाभागातील युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'होय लढणार, जिंकणार, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणार' या टॅगलाईनला सोशल मीडियावर पाठिंबा मिळत आहे. युवा समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या या जनजागृतीचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सीमालढ्याची तीव्रता प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हॅशटॅग, फेसबुक फोटो फ्रेम आणि टॅगलाईन वापरण्याची क्रेझ सुरु झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी सुमारे 50 हजार गॅस फुगे आकाशात सोडण्याचा संकल्प युवा समितीने केला आहे. सरकारी नियमांचे पालन करून सायकल फेरी काढण्यासाठी परवानगी मिळवण्याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णयही झालाय.परंतु, मराठी भाषिकांच्या वतीने या दिवशी मार्गसूची पाळून हा दिन आचरणात आणण्याचे निश्चित केले आहे. केंद्र सरकारविरोधात या दिवशी निषेध नोंदविण्यासाठी मराठी भाषिक एकत्र येतात. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी मिरवणूक आणि काळा दिन पाळण्यासाठी निर्बंध लादले आहेत. परंतु, या दिवशी निषेध हा नोंदविलाच पाहिजे असे मत सोशल मीडियावर उमटत आहे. सायकल फेरी काढता आली नाही, तरी घरोघरी काळे झेंडे लावून सरकारचा निषेध नोंदविण्यात यावा, असे मत अनेकजण व्यक्त करत आहे.