केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. या इमारतीच्या उदघाटन सोहळ्यावेळी एकंदर कामकाजाचा परामर्ष घेताना नितीन गडकरी चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या प्रचंड विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले. उदघाटनानंतर बोलताना गडकरी म्हणाले, 'अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण 2008 मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. 2011 मध्ये याची निविदा निघाली आणि हे 200 - 250 कोटींचं काम 9 वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत 3 सरकारं आणि 8 अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज ह काम पूर्ण झालं आहे.
सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी 2011 पासून 2010 पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावायला हवेत, असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला. '80 हजार ते 1 लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग 3 वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतो आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या खूप मोठ्या कामाला फक्त तीन साडेतीन वर्ष जर लागणार असतील, तर या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण दहा वर्ष घालवली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. पण मला हे सांगायची लाज वाटतेय. जे विकृत विचारांचे लोक (अधिकारी) आहेत. ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या. हे सगळे 12 ते 13 वर्षांपासून चिकटून बसले आहेत. जो कुणी नवीन अध्यक्ष येतो, त्यांचे मार्गदर्शक हे लोक बनतात. हे सगळंच पूर्णपणे नकारात्मक आणि विकृत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारलं जातं, हे मला कळत नाहीये.
मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचं उदाहरण म्हणजे ही इमारत आहे, असे कठोर उद्गार गडकरी यांनी काढले आहेत. तसेच या कामामध्ये समावेश असलेल्यांवर एक संशोधनपर निबंधच करावा असे सांगतानाच, या संस्थेचं इतकं नाव असूनही नालायक लोकांना घेतल्यामुळे अखेर आपण अपयशीच ठरलेलो आहोत, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली आहे. 'माझं नाव तर बदनाम झालंच आहे. पण आता, रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून द्यावं हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहिती आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे, लोकांचं वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटायला लागलंय की अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हे काम पूर्ण झालेलं बघण्यासाठी तीन सरकारं बदलून गेली. या पार्श्वभूमीवर मी तुमचं काय अभिनंदन करू? मला तुमचं अभिनंदन करायचीही लाज वाटतेय' अशा शब्दात गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावलं.