बेळगाव : कोरोना काळात शहरातील हॉटेल व लॉज क्वारंटाईनसाठी ताब्यात घेण्यात आले. अनेक भागात क्वारंटाईनसाठी विरोध झाल्याने हॉटेल व लॉज पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आले. आता त्याच हॉटेल व लॉजमालकांचे 80 लाख रुपयांचे बिल महापालिकेने थकविले आहे. शहरातील 28 हॉटेल व लॉज ताब्यात घेतले होते. त्यातील केवळ 4 हाॅटेल व लाॅजचे बिल महापालिकेने दिले असून 24 जणांचे बिल थकविले आहे. त्यामुळे, चौघांना एक न्याय व उर्वरितांना वेगळा न्याय का, असा सवाल हॉटेल व लॉजमालक करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी सातत्याने लेखा विभागाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. पण, निधी नसल्याचे कारण दिले जात आहे.
कोरोनाबाधितांच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील लोकांना क्वारंटाईनसाठी महापालिकेने शहरातील 28 लॉज व हॉटेल्स ताब्यात घेतले होते. प्रारंभी स्थानिक रहिवाशांनी हॉटेल किंवा लॉजचा ताबा घेताना मोठा विरोधही केला होता. पण, पोलिस बंदोबस्तात ताबा घेऊन क्वारंटाईन प्रक्रिया सुरू केली. जूनपर्यंत प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर प्रथम व द्वितीय संपर्कात आलेल्यांना घरीच क्वारंटाईन करण्यास सुरवात झाली. परराज्यातून आलेल्यांनाही हॉटेलचे भाडे देऊन क्वारंटाईन होण्याची मुभा दिली. त्यामुळे, केवळ एक हॉटेल ताब्यात ठेवून महापालिकेने उर्वरित सर्व हॉटेल व लॉज मूळ मालकांना परत केले. क्वारंटाईनसाठीचे भाडे राज्य शासनाने निश्चित केले होते. त्यानुसार हॉटेलमालकांनी महापालिकेकडे बिल सादर केले. जूनमध्येच बिल आरोग्य विभागात दिले. तेथून लेखा विभागाकडे पाठविले.
एकुण भाडे सुमारे 1 कोटी रुपये होते. त्यापैकी चौघांचे भाडे सर्वाधिक म्हणजे 20 लाख रुपये होते. ती रक्कम महापालिकेने त्या चौघांना दिली आहे. 24 जणांचे 80 लाख रुपये दिलेले नाहीत.
... तरच बिले देता येणार कोरोनासाठीमहापालिकेला आपत्ती निवारण निधीतून 1 कोटी रुपये निधी मिळाला. पण, तो सर्व निधी आधीच खर्च झाला आहे. आणखी 1 कोटी 60 लाखांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. तो निधी मिळाला तरच प्रलंबित बिले अदा करता येतील. त्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. निधी मंजूर झाला नसल्याने हॉटेल व लॉजमालकांचे 80 लाख रुपये कुठून द्यायचे, असा प्रश्न लेखा विभागासमोर आहे.