जंगलात गेलेल्या म्हशी आणण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय गवळ्यावर दोन धिप्पाड अस्वलांनी अचानक हल्ला चढविला. पण हातातील कुर्हाडीने जोरदार प्रतिकार करून अस्वलांचा हल्ला परतावून लावत केवळ अतुलनीय प्रसंगावधानाने गवळ्याने स्वतःची सुटका करून घेतली. जोयडा तालुक्यातील बाडगुंद गवळी वाड्यानजीक हा थरारक प्रकार घडला. बाडगुंद गवळीवाड्यावरील बाबू पाटील (वय 50) हे आज सायंकाळी जंगलात गेलेल्या म्हशीना आणण्यासाठी गेले असतांना त्यांच्यावर दोन अस्वलांनी अचानक हल्ला चढविला. काही कळायच्या आत त्यांना खाली पाडून दोन्ही अस्वलांनी लचके तोडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात बाबू रक्तबंबाळ झाले. पण त्यांनी धीर न सोडताअंगी असलेले सर्व बळ एकवटून सर्वशक्तीनिशी प्रतिहल्ला केला.
कुर्हाडीच्या वाराने बेजार झालेल्या अस्वलांनी बाबू यांना त्याच ठिकाणी सोडून जंगलात पळ काढला. कसे तर घर गाठून त्यांनी घडला प्रकार सांगितला. अस्वलांनी त्यांच्या पायाचा चावा घेतला. जखमी अवस्थेतही ते सुखरूप घरी परतले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत स्थिर आहे. पावसाच्या वातावरणामुळे अस्वले दिवसाही जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे गुरे घेऊन जंगलात गेलेल्या गवळ्यांना स्वरक्षणासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी लागते. अनेक वेळा हिंस्त्र प्राण्यांचा सामना करावा लागत असल्याने गवळी बांधवांनी स्वरक्षणाचे तंत्र आत्मसात केले आहे. यामुळेच बाबू यांनी दोन अस्वलांच्या तावडीतून स्वतःची सहीसलामत सुटका करून घेतली.