कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात; राज्याचा पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील : विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळकर्नाटक : एच. डी. कुमारस्वामी यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या बी.एस. येडियुरप्पा यांचं पद धोक्यात आलं आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता असून, भाजपाच्याच आमदारानं हा गौप्यस्फोट केला आहे. 'लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येणार असून, पंतप्रधान मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल असं म्हटलं आहे', असा दावा भाजपाच्या आमदारानं केल्यानं पक्षातील गृहयुद्ध चव्हाट्यावर आलं आहे.
भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी पक्षाच्या विजापूरतील एका कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केल्यानं कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर राज्यातील बहुसंख्य वरिष्ठ नेते नाराज आहेत, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असं सांगितलं आहे. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले. उत्तर कर्नाटकातील जनतेनं 100 आमदार दिले, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,' असं सांगत त्यांनी गौप्यस्फोट केला.
एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, आता येडियुरप्पा यांना पक्षातून विरोध होताना दिसत आहे. भाजपाच्या आमदारानेच हा विरोध जाहीरपणे बोलून दाखवला असून, पंतप्रधान मोदींचा हवाला दिल्यानं कर्नाटकातील सत्तानाट्य पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याची चिन्हं आहेत. त्याचबरोबर पक्षातंर्गत विरोध शमवण्यात येडियुरप्पा यशस्वी ठरणार का? याकडेही राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची सध्या तरी रिकामी नाही...पुढेही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या रूपाने कायम राहणार आहे. त्यामुळे आ. बसनगौडा पाटील - यत्नाळ यांनी नको ती विधाने करू नयेत, असा टोला गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमाण्णा यांनी लगावला. मंगळवारी भाजपचे विजापूर येथील बसनगौडा पाटील यांनी मुख्यमंत्री लवकरच बदलणार, असे वक्तव्य केले होते. तुमकूर येथे एका कार्यक्रमात त्याचा समाचार घेताना सोमाण्णा म्हणाले, बसनगौडा जे बोलले त्याबद्दल त्यांना जे सांगायचे आहे, आम्ही सर्वांनी सांगितले आहे. पुनःपुन्हा तेच ते बोलल्याने त्याचे महत्त्व राहात नाही, त्यामुळे बसनगौडा यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देऊ नका. येडियुराप्पा हे आमचेसर्वांचे नेते आहेत, ते पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतील, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांविरोधात बोलणारे बसनगौडा पाटील - यत्नाळ यांनी दुसऱ्या दिवशीही रान उठवले. मंत्रिपदासाठी मी कोणाचे कधी पाय धरणार नाही व हुजरेगिरी करणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी आज ट्विटद्वारे केले.