बेळगाव ता. खानापूर : खानापूर नगरपंचायतीची निवडणूक 31 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. तर निवडणूक निकाल 3 सप्टेंबर 2018 रोजी लागला होता. पण गेले 24 महिने वेगवेगळ्या कारणांमुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली नव्हती. निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता 21 ऑक्टोंबर ही तारीख जाहीर होताच खानापूर शहरात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड बुधवारी (21 ऑक्टोबर) रोजी होणार आहे. खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सामान्य गटासाठी तर उपाध्यक्ष पद हे अनुसुचित जमाती महिलेसाठी जाहिर झाले आहे. सकाळी 10.30 ते 1 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर दुपारी 3 वाजता मतदान होणार आहे.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष - उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. राजकीय खलबते सुरू झाली असून, नगराध्यक्षपदासाठी सामान्य आरक्षण आल्याने नारायण मयेकर आणि अप्पय्या कोडोळी यांनी तयारी चालविली आहे. तर उपनगराध्यक्ष म्हणून लक्ष्मी अंकलगी यांची निवड निश्चित आहे. आरक्षणाचा वाद न्यायालयात गेल्याने सलग दोन वर्षे नगरसेवकांना अधिकारापासून वंचित राहावे लागले. आता आरक्षण जाहीर झाल्याने हा तिढा सुटला आहे. नगरसेवकांची संख्या 29 असताना त्यातील प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक रफीक खानापुरी यांचे अलीकडेच निधन झाले. ती जागा सध्या रिक्त आहे. रफीक खानापुरी हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते. त्यांच्या निधनानंतर या पदावर त्यांचा मुलगा नगरसेवक मझहर खानापुरी यांची वर्णी लावण्यासाठी त्यांचे समर्थक मोर्चेबांधणी करीत आहेत. परंतु, त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नसल्याने मझहर खानापुरी यांनी स्वतंत्रपणे प्रयत्न चालविले आहेत.
प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक सिद्धोजी गावडे यांचेही निधन झाले. मात्र, तेथील पोटनिवडणूक होऊन त्याठिकाणी अप्पय्या कोडोळी निवडून गेले. नगरसेवक नारायण मयेकर आणि अप्पय्या कोडोळी यांनी नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. नारायण मयेकर हे यापूर्वी उपनगराध्यक्ष होते. बऱ्याचदा त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी लॉबिंग सुरू करुन नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालविली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मी अंकलगी या एकमेव दावेदार असल्याने त्यांची निवड निश्चित आहे. नगराध्यक्ष निवडणूक मात्र रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कुणीच नगरसेवक त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडत नसल्याने इच्छुकांचीही गोची झाली आहे. निवडणुकीदरम्यान चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.