बेळगाव शहरापासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर वसलेल्या यरमाळ गावचा चेहरा मोहरा बदलणार आहे. घरांच्या भिंतीबरोबर छतांना, रस्त्यानाही रंग, भिंतीवर वेगवेगळे सामाजिक संदेश, सिमेंटचे रस्ते, पाण्याची सोय, शेतीसाठी आवश्यक सुविधा, जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. इंडोनेशियातील खेड्यांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे यरमाळ देशातील पहिले रंगीबेरंगी गाव ठरणार आहे. इंडोनेशियातील कमपुंग पेलंगी व मलंग गाव जगभरात रंगीबेरंगी गाव म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर यरमाळचा विकास करण्यात येणार आहे. घराच्या भिंतीबरोबर छतानाही आकर्षक रंग देण्यात येणार आहे. रस्त्यांनादेखील रंग देण्यात येणार आहे. देशपातळीवर नवीन संकल्पनेमुळे यरमाळ देशाच्या नकाशावर येणार आहे.
यासाठी आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आगामी 6 महिन्यांत गावाचा कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्चण्यात येणार असून योजनेबाबत माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी रविवारी आ. अभय पाटील यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांच्यासोबत त्यांनी योजनेबाबत चर्चा केली. यरमाळ येथे सध्या 1 कोटी 50 लाख खर्चुन सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. आगामी काळात 2 कोटींच्या निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी घालण्यात येणार आहे. ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने त्यांना आधार देण्यासाठी 10 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे.
शेतीचे उत्पादन वाढीसाठी 1 लाख 30 हजार रु. पुरवण्यात येणार आहेत. भूजल पातळी वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी अडवण्यासाठी प्रत्येक घराला विकासकामे राबवण्यात येणार आहेत. आगामी 6 महिन्याच्या कालावधीत विकासकामे राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने योजना राबवण्यात येणार आहे. ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळणार असून यातून पर्यटनालादेखील वाव मिळणार आहे. शेतीचा विकास होणार असल्याने कृषी पर्यटनदेखील वाढीस लागण्याची शक्यता आहे.