बेळगाव—belgavkar : मतदारांकडून मिळणारे प्रेम पाहून हे ऋण कसे फेडावे, मला समजत नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे मृणाल हेब्बाळकर याचा विजय निश्चित आहे. मागील कोणत्याही खासदाराने केले नाही याप्रकारे मतदारसंघाचा विकास करण्यात येईल. काँग्रेसच्या पंचहमी योजना जनतेला लाभदायक ठरल्या असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार जोमात सुरू आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा वाढत आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. परंतु, आता मुलाच्या विजयासाठी त्यांनी प्रचाराने रान उठवले आहे. आमदार व मंत्री म्हणून केलेल्या कामाला प्रतिसाद मिळत आहे, मंत्री हेब्बाळकर ज्याठिकाणी प्रचाराला जात आहेत त्याठिकाणी त्यांचे मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. मतदारांमध्ये बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे.
काँग्रेसने राबविलेल्या पंचहमी योजनांचे कौतुक केले जात आहे. पंचहमी योजनांचा फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती आदी योजनांमुळे आधार मिळाल्याने मतदारांकडून सांगण्यात येत आहे. गावागावांतून मंत्री हेब्बाळकर यांचे आरती करुन स्वागत करण्यात येत आहे. प्रत्येक गावात आरती, पुष्पवृष्टी करुन स्वागत केले जात आहे. मंत्री हेब्बाळकर यांनी ग्रामीण मतदारसंघाचा आदर्श विकास केला आहे. त्यांनी नेहमी विकासकामांना प्राधान्य दिल्यामुळे ग्रामीण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत 56 हजारच्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला होता.