गेल्या 36 तासांपासून सातत्याने झालेल्या पावसामुळे बेळगावात जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे बेळगावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव शहरासह उपनगरांमध्येही पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातही पावसाचा जोर वाढलाय. शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. येत्या 24 तासात बेळगावमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मंगळवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांची गती वाढली आहे. म्हणूनच येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
हब्बनहट्टी (जांबोटी ता. खानापूर) येथील श्री मारुती मंदिर
गेल्या 24 तासांत खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब भरल्याने खानापूर शहरातील मलप्रभा नदी अशी ओसंडून वाहत आहे.
एपीएमसीची भिंत कोसळली : जोरदार पावसामुळे एपीएमसी परिसरात पाणी पाणी झाले आहे. या पावसामुळे ज्योतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडील भिंत कोसळली आहे. त्यामुळे एक जुनी भिंत आता नामशेष झाली आहे. मागील अनेक वर्षापासून ही भिंत होती. मात्र मागील दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली आहे.
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर बोर्ड जवळ नारळाचे झाड कोसळल्याने काही काळ रहदारीत अडथळा निर्माण झाला होता.
बेळगाव शहरात अनेक उपनगरात पाणी साचत आहे. नेहमी प्रमाणे टिळकवाडी येथील महात्मा गांधी कॉलनीतील काही भागात घरात पाणी शिरले आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कालपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शहरांत घुसल्याचे चित्र दिसून येत आहे.
बेळगाव येथील रेल्वे उड्डाण पुलावर (RoB) कोसळले झाड काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत.