मिरज ते लोंढा अशा एकूण 186 कि. मी. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. 7 टप्यांमध्ये हे काम करण्यात येत असून पहिला टप्पा चिकोडी ते घटप्रभा पूर्ण करण्यात आला आहे. डिसेंबर 2019 पासून सुरू झालेले हे दुपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वे राज्यमंत्र्यांनी नुकतीच एक ऑनलाईन बैठक घेऊन पुणे ते लोंढा दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मध्य व नैर्ऋत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनामुळे मध्यंतरी दुपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली आहे. आता पुन्हा एकदा या कामाची गती वाढविली जात आहे. हे काम लवकर पूर्ण करून या मार्गावर रेल्वेची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी सांगण्यात आले.
चिकोडी - घटप्रभा टप्यातील काम पूर्णचिकोडी ते घटप्रभा या 16 कि. मी. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पहिल्या टप्यात पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चिकोडी ते रायबाग, रायबाग ते चिंचली व चिंचली ते कुडची अशा 31 कि. मी. दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे रेल्वेच्या गतीमध्ये नक्कीच वाढ होऊन रेल्वे प्रवास अधिक आरामदायी व वेळेत करता येणार आहे.
तिसऱ्या टप्यात बेळगाव - देसूर - खानापूर अशा 25 कि. मी. चे काम अंतिम टप्यात आहे. काही ठिकाणी लहान ब्रिज बांधण्यात येत आहेत.
चौथ्या टप्यातील खानापूर - लोंढा या 25 कि. मी. रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
पाचव्या टप्प्यात बेळगाव - सुलधाळ हा 30 कि. मी., सहाव्या टप्प्यात सुलधाळ - घटप्रभा या 30 कि. मी. तर शेवटच्या सातव्या टप्यात कुडची ते मिरजदरम्यान 33 कि. मी. चे रेल्वे दुपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
दोन वर्षात होणार विद्युतीकरणरेल्वेची गती वाढावी व इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी नैर्ऋत्य व मध्य रेल्वेच्या प्रयत्नातून दुपदरी करणाबरोबरच रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मिरज - लोंढा या रेल्वे मार्गावरील काही रेल्वे स्थानकांवर विद्युतीकरणासाठीची उपकरणे बसविण्यात आली आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये हे विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.