कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाचा निकाल लागेल, त्यावेळी लागेल. तत्पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने सीमाप्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचा विश्वास सीमाप्रश्न तज्ञ समितीचे नूतन अध्यक्ष खासदार धैर्यसील माने यांनी व्यक्त केला. येथील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांनी खासदार माने यांची अध्यक्षपदी निवडीबद्दल कोल्हापूर येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर खासदार माने यांनी सीमावासियांच्या विविध समस्या जाणून घेऊन संवाद साधला.
प्रारंभी कार्यकर्त्यांनी सीमावासियांवर कर्नाटक शासन, प्रशासनाकडून वाढलेल्या दडपशाहीची माहिती खासदार माने यांना दिली. त्यानंतर खासदार माने म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिक लोक आपलेच आहेत. वर्षानुवर्षे सीमावासियांना होणारा त्रास मी पाहतोय. आता आपल्याकडे तज्ञ समितीचे अध्यक्षपद आल्याने याप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाकडे आवाज उठवून सीमाविसायांना न्याय देण्याची संधी लाभली आहे. पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याप्रश्नी आपण वस्तुस्थिती मांडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याची माहिती देणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या चर्चेने याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी आपले प्रयत्न होतील. महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातही मराठी भाषिकांच्या समस्या मांडून त्या निवारणासाठी प्रामाणिक काम करू. दिल्लीत गेल्यावर आपण प्रथम सीमाप्रश्नी वकीलांची बैठक घेणार आहे. कोणत्याही समस्या, अडचणी असतील तर सीमावासियांनी आपल्याला हक्काने सांगाव्यात. सीमावासियांच्या पाठीशी ठाम आहोत.यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष बंडा पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी वेगवेगळ्या समस्या खासदार माने यांच्याकडे मांडल्या. काही समस्यांच्या बाबतीत खासदार माने यांनी लेखी पत्र देण्यास सांगितले. यावेळी अजित पाटील, गणेश माळवी, सुनिल किरळे, श्री. वारके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.