बेळगाव : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर व सुरक्षितता याची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमांमध्ये सामाजिक अंतर व सुरक्षितता या विषयाचा समावेश करावा, अशी मागणी बेळगाव सिटीजन्स कौन्सिलतर्फे शिक्षक मतदार संघाचे आमदार अरुण शहापूर यांना करण्यात आली. टिळकवाडी हायस्कूल येथे आमदार अरुण शहापूर यांची सिटीजन्स कौन्सिलच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. शाळा सुरू करणे बाबत शिक्षणमंत्र्यांनी पालकांचा अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे ऑक्टोबरनंतरच शाळा सुरू कराव्यात असा सूर पालकांमध्ये आहे. लहान मुले सामाजिक अंतर पाळत नसल्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी घाई नको, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
तीन टप्प्यात फी भरण्याची सुविधा द्याशैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळा संपूर्ण फी भरण्याची सूचना करत आहेत. परंतु सध्या पालकांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे तीन समान हप्त्यांमध्ये शैक्षणिक फी भरण्याची मुभा देण्याचे आदेश सरकारने द्यावे, शाळांनी गणवेश व इतर नवे साहित्य, सहली, वार्षिक स्नेहसंमेलन यांचा बोजा फी तून पालकांवर लादू नये, आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी औषधे उपलब्ध करून द्यावी, शाळांचे परिसर सॅनिटाईझ करावे, जिल्हा स्तरावर टास्क फोर्स कमिटीची स्थापना करावी, दररोज एक तास योगा क्लासेस चालवावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे आमदार अरुण शहापूर यांच्याकडे करण्यात आल्या.
आमदार शहापूर यांनी सिटीजन्स कौन्सिलचे कौतुक केले. कौन्सिलने दिलेल्या सूचनांचा नक्की विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सिटीजन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर सेवंतीलाल शहा, अरुण कुलकर्णी यासह इतर सदस्य उपस्थित होते.