यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्यांनं संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या आणि शहिदांच्या आत्मत्यागाला सलाम करण्यासाठी विविध निर्णय घेतले. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. संरक्षण मंत्रालयासोबतच्या सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शिक्षण मंत्रालय शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथांचा समावेश करेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. 'वीर गाथा' स्पर्धेतील (सुपर 25) 25 विजेत्यांना सन्मानित करणार्या एका पुरस्कार सोहळ्यात ते उपस्थितांना संबोधित करत होते.
यावेळी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारतातील वीरांचा सन्मान करण्यापेक्षा अमृत महोत्सवाचा दुसरा चांगला उत्सव असू शकत नाही. वीरगाथा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. ते म्हणाले की देशभक्तीची तीव्र भावना आणि आपल्या शूरवीरांप्रती कृतज्ञतेची भावना विकसित करण्याची ही गुरुकिल्ली आहे. आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, मुलांना शौर्य कृत्यांची प्रेरणा आणि माहिती देण्यासाठी वीर गाथा आयोजित करण्यात आली होती. 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना रेखाचित्रे, निबंध, कविता आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि मूल्यांकनाच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांना 'सुपर 25' म्हणून घोषित करण्यात आले.
मुलांमध्ये लहानपणापासूनच 'राष्ट्राप्रती जबाबदारी'ची भावना दृढ करण्यासाठी शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून आपल्या सैनिकांचे शौर्य आणि गेल्या 75 वर्षांतील भारताची वीरगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे काम करेल असंही केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. त्यामुळे आता लवकरच विविध वीरांची यशोगाथा मुलांना लवकरच शालेय अभ्यासक्रमात शिकायला मिळणार आहे.