मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये परस्पर वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर बॉम्बने हल्ला केला. या सुमारे 2 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. वादाच्या वेळी घटनास्थळी लोक जमा झाले होते, त्याचवेळी कोणीतरी तिथे बॉम्ब फेकला आणि जोरदार स्फोट झाला. सर्वत्र गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सर्व जखमींना महू येथील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं. इंदूरजवळील महूमधील बडगोंड पोलीस स्टेशन हद्दीतील बेरछा गावातील हे प्रकरण आहे. इथे काही लोक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची तयारी करत होते.
यादरम्यान काही तरुणांनी दारू प्यायली आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. हे पाहून घटनास्थळी एकच गर्दी जमली. या भांडणादरम्यानच एका तरुणाने लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये पडलेला बॉम्ब उचलला आणि गर्दी जमलेल्या ठिकाणी फेकला. यामुळे त्याठिकाणी मोठा स्फोट झाला. या घटनेत बॉम्ब फोडणाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला. तर, सुमारे 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये सात महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
बेरछा गाव आर्मी फायरिंग रेंजजवळ आहे. डिफेक्टिव बॉम्ब फायरिंग रेंजमध्येच ठेवले जातात. हे बॉम्ब गावातील लोक घेऊन जातात. गावकरी या बॉम्बमधून पितळ काढून ते विकतात. इथलाच एक बॉम्ब उचलून या तरुणाने गर्दीमध्ये फेकला. ज्यामुळे तिथे स्फोट झाला. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एएसपी शशिकांत कांकणे यांनी सांगितलं की, दोन व्यक्तींमध्ये अंतर्गत वाद होता. वाद वाढल्यानंतर एका तरुणाने बॉम्ब फेकला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींची परिस्थिती गंभीर आहे.