देशातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनीही त्यांचे गाव अंधारात आहे. देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीत आघाडीवर असलेल्या मुर्मू यांचे गाव आजही अंधारात आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील डुंगरशाही हे मुर्मू यांचे मुळ गाव आहे. या गावात आजही वीज नसून साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी गावकऱ्यांना एक किलोमीटर दूर जावं लागतं. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरखेडा गावात झाला. सुमारे 3500 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात बडा शाही आणि डुंगुरशाही या दोन वस्त्या आहेत. बडाशाहीमध्ये वीज आहे पण, 'आजतक' नं दिलेल्या वृत्तानुसार डुंगरशाही आजही अंधारात बुडालेलं आहे. या गावातील नागरिकांना केरोसिनच्या प्रकाशात रात्र घालवावी लागते.
द्रौपदी मुर्मू यांचे भाचे बिरंची नारायण टुंडूसह या गावातील 20 कुटुंब आजही अंधारात जगत आहेत. बिरंची हे शेतकरी असून पत्नी आणि दोन मुलांसह या गावात राहातात. या गावातील स्थानिकांनी मुर्मू राष्ट्रपती होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडं लाईट कनेक्शनसाठी अर्ज केला होता. मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर होतच डुंगुरशाही चर्चेत आलं आहे. या गावाला माध्यमांच्या प्रतिनिधिंनी भेट दिली. त्यावेळी इथं वीज नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर ओडिशा सरकारला जाग आली. सरकारनं गावात वीजेचे खांब आणि ट्रन्सफॉर्मर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय.
माहितीनुसार दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेनुसार या आदिवासी बहुल भागातील बडाशाहीपर्यंत वीज पोहचली आहे, पण अद्याप डुंगुरशाही वीजेपासून वंचित आहे. या गावातील नागरिकांना द्रौपदी मुर्मू यांचा अभिमान आहे. त्यांना राष्ट्रपतीची उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केलाय. त्याचबरोबर गावात अद्याप वीज नसल्यानं नाराजीही व्यक्त केली आहे. आता आगामी काळात गावातील प्रत्येक घर विद्यूत प्रकाशात उजळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.