बेळगाव : कर्नाटकाची दुसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बेळगावला सेकंड हॅन्ड बस दिल्या जात आहेत. वायव्य परिवहन महामंडळाच्या 2400 बस कालबाह्य झाल्या आहेत. नवीन बस घेण्यासाठी अनुदान मिळत नसल्याने जुन्या बसचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये पुन्हा बंगळुरातील भंगारात निघालेल्या 20 बसची भर पडणार आहे. त्यामुळे बेळगावातील प्रवाशांना सेकंड हॅन्ड बसमधून प्रवास करावा लागणार आहे. नवीन 1500 बसची गरज असून त्या मिळवण्यासाठी परिवहन महामंडळ सरकारकडे पाठपुरावा करत आहे.
परिवहन महामंडळाच्या नियमानुसार 9 लाख कि.मी. धावलेल्या बस कालबाह्य करण्यात येतात. बेळगाव आगारातील निम्म्याहून अधिक बसेस कालबाह्या झाल्या आहेत. या सर्व बसेस प्रवासासाठी असुरक्षित आहेत. असे तांत्रिक विभागाने स्पष्टपणे नमूद केले. परिवहनच्या 53 युनिटमध्ये 4800 बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी 2400 हून अधिक बसेसनी 9 लाख किमी. चा अंतर पार केले आहे. 600 बससेनी 13 लाख किमी अंतर कापले आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील 665 बसेस कालबाह्य झाल्या आहेत. जुन्या बसेस बंद करून नवीन बस खरेदी करण्यासाठी परिवहन महामंडळाकडे पैसे नाहीत. राज्य सरकार अनुदानही देत नाही. त्यामुळे परिवहन महामंडळाची मदार ही जुन्या बसवरच आहे. पावसाळ्यात तर अनेक बसला गळती लागल्यामुळे प्रवाशांचेच नव्हे तर वाहनचालकांचेही हाल होत आहेत.
बंगळूरमध्ये दहा वर्षे वापरलेल्या सुमारे 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. यातील 20 बस बेळगावात धावणार असल्याची माहिती मिळाली आहे. बंगळूर महानगर परिवहन महामंडळाने सुमारे 10 वर्षे वापरलेल्या 25000 बस भंगारात काढल्या आहेत. वायव्य परिवहन महामंडळाने या बस खरेदी केल्या आहेत. त्या बस दुरुस्त करुन बेळगावात धावणार आहेत. 8 ते 9 लाख कि. मी. धावलेल्या बस प्रवासासाठी धोकादायक असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या बस भंगारात काढल्या जातात. आता या बस दुरुस्त करुन वापरण्यात येणार आहेत.