बेळगाव : भाकड काळातील गायींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गो-शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यंदा वर्षअखेर या कामाला चालना दिली जाणार आहे. राज्य सरकारने याबाबत उच्च न्यायालयात प्रस्ताव पाठविला आहे. यापूर्वी राज्यातील काही भागात गो-शाळांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. येत्या काळात इतरत्र ठिकाणीही गो-शाळा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भटक्या जनावरांची धरपकड थांबणार आहे. शिवाय भाकड आणि भटक्या गायींचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत चिक्कबळ्ळापूर, दक्षिण कन्नड, उडुपी, शिमोगा, गुलबर्गा, बेळगाव आदी ठिकाणी गो-शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यापैकी बेळगावसाठी हुक्केरी तालुक्यातील बेळवी गावात 19 एकर 4 गुंठे जागा संपादित केली आहे. पशुसंगोपन खात्याकडून गो-शाळेसाठी भूमिपूजन झाले. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात लवकरच गो-शाळा उभी राहणार आहे. साधारण 200 गायींची क्षमता असणारी गो-शाळा उभारली जाणार असल्याने जिल्ह्यातील गायी ठेवण्याची व्यवस्था होणार आहे.
महाराष्ट्रातील गो-शाळांच्या धर्तीवर विकास साधला जाणार आहे. यामध्ये दुधापासून उपपदार्थ बनविणे, गो-आधारित शेती, सेंद्रिय खत, बायोगॅससारखे प्रकल्पही राबविले जाणार आहेत. त्यामुळे गो-शाळेतून काही प्रमाणात उत्पन्नही प्राप्त होणार आहे.