India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचवी लढत जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पहिली ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याच्या रिषभ पंतचे स्वप्न पावसात वाहून गेले. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणारी पाचवी लढत पावसामुळे रद्द करावी लागली. पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-20 लढत 50 मिनिटे उशीराने सुरू झाली आणि 3.3 षटकांचा सामना झाल्यानंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. पाऊस थांबायची चिन्ह न दिसल्याने सामना रद्द करण्यात आला आणि ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येत होता आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा रिषभ पंत हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही. पाचव्या सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आली नाही. इशान किशनने पहिल्या षटकात दोन षटकारांसह 16 धावा केल्या, परंतु दुसऱ्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला आणि भारताला 27 धावांत 2 धक्के बसले.
पावसामुळे हा सामना आधिच 19-19 षटकांचा करण्यात आला होता. या मालिकेत 200+धावा करणारा इशान हा पहिलाच फलंदाज ठरला. पण, लुंगी एनगिडीने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला धक्का दिला. एनगिडीने टाकलेला स्लोव्ह यॉर्कर खेळण्यास इशान चुकला अन् त्याचा त्रिफळा उडाला. 7 चेंडूंत 15 धावा करून तो माघारी परतला. ऋतुराजकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तोही चौथ्या षटकात एनगिडीच्या स्लोव्ह चेंडूवर फसला अन् 10 धावांवर झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर जो पाऊस सुरू झाला तो थांबलाच नाही.