दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती, पण त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन विजय मिळवून मालिका गमावण्याचे संकट टाळले आहे. भारतीय संघाला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकण्याची संधी मिळणार आहे. काही कमकुवत बाजूंचा अपवाद वगळता भारतीय संघाचे पारडे जड आहे, मात्र आज होणाऱ्या सामन्यात मोठा धोका आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रविवारी सायंकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात वादळी पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज पावसाची शक्यता आहे, आणि गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
पावसामुळे रणजी ट्रॉफीच्या सामन्यांवरही परिणाम झाला होता. पाऊस थांबला नाही, तर या दोघांनाही संयुक्तपणे विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचा थरार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला 8 सामने जिंकण्यात आले आहे. भारतीय संघ आजपर्यंत आफ्रिकन संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर मालिका जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे.
पहिले दोन सामने जिंकल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ जोमात आला होता, परंतु शुक्रवारी झालेल्या चौथ्या सामन्यात झालेला मोठा पराभव त्यातच कर्णधार बावूमाला झालेली दुखापत दक्षिण आफ्रिकेची गाडी रुळावरून घसरण्याच्या स्थितीत आहे. आयपीएल गाजवणारा दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून ठसा उमटवत आहे, तर आवेश खान आणि हर्षल पटेल वेगवान गोलंदाजीतील भेदकता दाखवत असताना युझवेंद्र चहल फिरकीची जादू सादर करत आहे.