बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी मोर्चा काढण्याआधी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करावी. मीसुद्धा याबाबत बोलणार आहे, अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली. त्यानुसार समिती नेते आणि जिल्हाधिकारी यांच्यात दोन दिवसांत बैठक होणार आहे. घटनात्मक अधिकारानुसार मराठी कागदपत्रांसाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती समिती विराट मोर्चा काढणार आहे. त्याबाबत गावागावांत जनजागृती सुरू आहे. या मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली. भाषिक अल्पसंख्याक कायदा आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून कागदपत्रे मिळावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाला डेडलाईन देण्यात आली होती.
मात्र अद्याप प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे 27 जून रोजीच्या मोर्चाची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली समिती शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाची माहिती पोलिस आयुक्तांना देण्यात आली. त्यावर आयुक्त बोरलिंगय्या यांनी मोर्चा काढण्याआधी एकदा जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करावी. आपण स्वतः देखील जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करू. त्यानंतर मोर्चा बाबत निर्णय घेतला जावा, अशी विनंती केली. यावेळी मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष तथा आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, डीसीपी चंद्राप्पा, एसीपी नारायण बरमणी उपस्थित होते.