बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दुकानदारांवर अतिक्रमण हटाव मोहिमेचा बडगा उगारण्यात आला. शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवार संपूर्णपणे मोकळे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी असणाऱ्या चहा, खाद्यपदार्थ आणि इतर विक्रेत्यांच्या सर्व टपऱ्या हटविण्याची कामगिरी महानगर पालिकेच्या पथकाने केली.
महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे नुकसानीचा फटका बसणार असल्यामुळे काही व्यावसायिकांनी आयुक्तांकडे याबद्दल तक्रार मांडली. त्यावेळी आयुक्तांनी या आवारात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय आणि अडथळे निर्माण होऊ नयेत यादृष्टीने व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले.