बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची महत्त्वाची बैठक बुधवारी (8 जून) मुंबई येथे होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार असून, लवकरात लवकर सीमा प्रश्नाच्या दाव्याच्या सुनावणीसाठी प्रयत्न होणार आहेत, अशी माहिती मध्यवर्ती समिती बैठकीत देण्यात आली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक शनिवारी मराठा मंदिर कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.
दळवी म्हणाले, तज्ज्ञ समितीची बैठक 8 जून रोजी होणार आहे. सीमाप्रश्नी काय केले आहे आणि येणाऱ्या काळात काय करण्याची गरज आहे, याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बैठकीला बेळगाव येथून ज्येष्ठ नेते अॅड. राम आपटे, अॅड. राजाभाऊ पाटील तसेच दिनेश ओऊळकर सहभागी होतील. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर तज्ज्ञ समिती अध्यक्षपद रिक्त होते. कोरोनामुळे कामकाजात शिथिलता आली होती. आता या रिक्त जागेवर महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची ही पहिलीच बैठक असणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिली.