बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी 27 जून रोजी मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, भव्य मोर्चासाठी बेळगाव, खानापूर व निपाणी भागातील गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली आहे. मोर्चा आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी मराठा मंदिर येथे बैठक झाली.
यावेळी दळवी म्हणाले, कन्नडसक्ती आंदोलनात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वीस दिवसांच्या आत मराठीतून कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी केली होती. तसेच कागदपत्रे न दिल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार 27 तारखेला 'एक सीमावासी, लाख सीमावासी' हा नारा देत हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी होतील. यासाठी प्रत्येक गावागावांत बैठक घेऊन नागरिकांना माहिती द्यावी, असे आवाहन केले.