कर्नाटकात विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार भाजपचे (BJP) दोन तर काँग्रेसचा (Congress) एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून येऊ शकतो. परंतु धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे (JDS) चौथा उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ नाही. त्यामुळे चौथ्या जागेविषयी औत्सुक्य वाढले आहे. काँग्रेसला जुना सहकारी असलेल्या जेडीएसनं पाठिंबा दिल्यास अथवा भाजपच्या जादा मतांच्या आधारावर चौथ्या जागेवर दावा सांगता येऊ शकतो. काँग्रेसकडे राज्यसभेच्या चारपैकी एक जागा जिंकण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे. परंतु, दुसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला जेडीएसच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. रमेश यांच्याशिवाय माजी आमदार इवो डिसोझा आणि माजी खासदार व्ही. एस. उग्रप्पा यांनीही पक्षाकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाल्याने ख्रिश्चन समुदायाच्या काही सदस्यांनी कर्नाटकचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याशीही संपर्क साधला आहे.
निर्मला सीतारामन आणि के. सी. राममूर्ती यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चौथा सदस्य निवडण्यासाठी 13 ते 14 आमदार कमी असलेले जेडीएस, काँग्रेस हे भाजपच्या अतिरिक्त मतांकडे लक्ष ठेवून आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे भाजप नेतृत्वाशी बोलण्याची शक्यता आहे. राज्यसभेचा सदस्य निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त 45 आमदारांची मते गरजेची असतात. भाजप 122 आमदारांसह दोन उमेदवारांना सहज निवडून आणू शकतो. काँग्रेस 69 आमदारांसह एक जागा आरामात जिंकू शकते आणि जेडीएसचे 32 आमदार असून, त्यांना 13 अधिक मतांची आवश्यकता असेल. परंतु, जेडीएस भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसमधील एका गटाला पक्षाच्या सरचिटणीसप्रियांका गांधी यांनी राज्यसभा निवडणूक कर्नाटकातून लढवावी, असे वाटत आहे. राज्यातील राज्यसभेच्या चार जागा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे के. सी. राममूर्ती, जयराम रमेश आणि दिवंगत ऑस्कर फर्नांडिस यांचा कार्यकाळ 30 जूनला संपुष्टात येत असल्याने रिक्त झाल्या आहेत. कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे नेते प्रियांका गांधींना राज्यातून राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. प्रत्येक राज्यसभा निवडणुकीदरम्यान प्रियांकांचे नाव समोर येते. कर्नाटकातील विद्यमान राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रमेश यांना हरियानातून निवडणूक लढविण्याचे आमंत्रण दीपेंद्रसिंग हुड्डा यांनी दिले आहे. यामुळे रमेश हे दुसऱ्या राज्यातून निवडणूक लढू शकतात. असं घडल्यास पक्षाला दुसरा उमेदवार शोधावा लागेल.