कर्नाटक : 2030 सालापर्यंत जगात हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे कुख्यात वैशिष्ट्य भारताच्या वाट्याला येणार असून, दर चौथा मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांमुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सी.एन. मंजुनाथ यांनी दिला. या संकटाला तोंड देण्यासाठी ताण व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी आत्मसात करण्यासह समग्र एकात्मिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन येथील ‘श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’चे संचालक मंजुनाथ यांनी ‘एचएएल मेडिकॉन 2022’ला संबोधित करताना केले. हिंदूस्तान एरॉनॉटिक्स लि. मधील डॉक्टरांसाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.
पक्षाघातही मोठा शत्रू : जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू हे हृदयविकार व पक्षाघातामुळे होतात. सध्या भारतात दरवर्षी 30 लाख लोक हृदयविकार व पक्षाघाताने मरण पावतात. त्यातील 40 टक्के लोक हे 55 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. गेल्या 26 वर्षांत भारतात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 34 टक्क्यांनी वाढले आहे. भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे, तर 25 टक्के रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. ही काळजी घ्या: व्यसनांपासून दूर राहा उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करा खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा