बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव व सीमा कक्षाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सीमाप्रश्नी तातडीने पावले उचलावीत, अशी सूचना केली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी याबाबतही आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. मंगळवारी मंत्री जयंत पाटील बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदींनी सर्किट हाऊस येथे त्यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी. तसेच, यासंदर्भात येणाऱ्या इतर अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी केली होती.
त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली होती. तसेच, मुंबई येथे गेल्यानंतर बुधवारी त्यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही दिली होती. मुंबईतील मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव व सीमाप्रश्नी नेमण्यात आलेल्या पक्षाचे अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी मंत्री पाटील यांनी न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी, यासाठी वकिलांची सातत्याने संपर्क साधावा व त्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी दूर कराव्यात व लवकरात लवकर या प्रश्नाची सोडवणूक व्हावी. त्यादृष्टीने प्रयत्नशील राहावे, अशी सूचना केली आहे.
महाराष्ट्राची बाजू भक्कम करण्यासाठी कोणतीही कसर बाकी राहू नये, यासाठी या खटल्यातील रिक्त जागी वकिलांची तातडीने नेमणूक करा, अशी सूचना मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने साक्षीपुरावे नोंद घेण्याची सूचना केली असली तरी कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे लवकर सुनावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने वकिलांना सूचना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सातत्याने केली जात असून, मंत्री पाटील यांनी समितीच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना सूचना केल्याने प्रश्नाला गती मिळण्याची शक्यता आहे. मंत्री पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर सीमा कक्षाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत समिती नेत्यांना माहिती दिली आहे.