बेळगाव : माजी मंत्री आमदार सतीश जारकीहोळी (केपीसीसी कार्याध्यक्ष) यांनी केलेल्या टीकेनंतर बेळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणूक संदर्भात प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी महापौर-उपमहापौर निवडणूक प्रक्रिया का थांबली आहे याबाबतची माहिती मनपा कौन्सिल विभागाकडून घेतली आहे.
गेल्या काही वर्षात बेळगाव महापालिकेत सतीश जारकीहोळी आणि भाजपचे आमदार अभय पाटील यांच्या शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जारकीहोळी यांनी अभय पाटील यांचे नाव घेऊन महापौर निवडणुकीसंदर्भात टीका केली होती. त्यानंतर बेळगाव महानगर पालिकेच्या राजकारणात संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जिल्हाधिकार्यांनी मनपा कौन्सिल विभागाकडे महापौर-उपमहापौर निवडणुकी संदर्भात माहिती घेतल्यामुळे मनपातील राजकारणाला नवे वळण मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी. अद्यापही महापौर आणि उपमहापौर निवडणूक झालेली नाही. त्यामुळे निवडणूक लवकरात लवकर घेतली जावी अशी मागणी होत असताना केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांची घोषणा करून टाकली आहे. बेळगाव महापालिकेमध्ये अनाधिकृत महापौर आणि उपमहापौर कार्यरत आहेत. दक्षिणचे आमदार महापौर आणि उत्तरचे आमदार उपमहापौर आहेत, तर उर्वरित सर्वजण चहा-बिस्कीटांसाठी मर्यादित आहेत, असे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले.