बेळगाव : राज्यशास्त्र शाखेतील पहिल्या सेमिस्टरचा निकाल संशयास्पद आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बेळगाव शाखेने केली आहे. यासंदर्भता पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या रजिस्ट्रारना (मूल्यमापन) निवेदन दिले. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र शाखेतील पहिल्या सेमिस्टरचा निकाल विद्यापीठाने 18 जानेवारी रोजी जाहीर केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 रोजी पुन्हा एकवेळ निकाल जाहीर केला.
यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण देऊन निकाल जाहीर केल्याचे स्पष्ट होते. केवळ राज्यशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत असा गैरप्रकार घडला आहे. विद्यापीठाने याची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलन उभारू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.