ही लग्नाची निमंत्रण पत्रिका राजेशाही पद्धतीनं बनवली आहे. उकाणी कुटुंबानं खास बनवून घेतलेल्या या लग्नपत्रिकेचे वजन 4 किलो 280 ग्रॅम असून एक पत्रिका बनवण्यासाठी 7000 रुपये खर्च झाले आहेत. या लग्नपत्रिकेमध्ये एकूण 7 पानं असून तीन दिवसांच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सर्व माहिती त्यात दिली आहे. तसेच काजू, बदाम, बेदाणे आणि चॉकलेटही निमंत्रण पत्रिका बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहेत.
या शाही विवाहात जय आणि हिमांशी हे जोडपं विवाहबद्ध होणार आहे. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे.
लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर श्रीनाथजींचे दर्शन दाखवण्यात आलं आहे. मौलेश भाई आणि त्यांच्या परिवाराची भगवान श्रीकृष्ण, द्वारकाधीश यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. ते द्वारका मंदिराचे विश्वस्तही आहेत. विशेष म्हणजे लग्नाच्या मुख्य मेजवानीत पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या थाळीची किंमत रु. 18000 आहे.
व्यापारी मौलेश उकाणी यांचा मुलगा जय याच्या लग्नानिमित्त तीन दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक दिवस ऐश्वर्या मजुमदार तसेच सचिन-जिगर यांच्या म्युझिक नाईटचेही आयोजन करण्यात आलं आहे. जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेस हे भारतातील सर्वात महागडं हॉटेल मानलं जातं. उम्मेद भवन पॅलेसमध्ये एक रात्र राहण्यासाठी 50000 रुपये देऊनही रूम मिळणं कठीण असतं. तसेच काही श्रेणींमध्ये रुमचे भाडे 2 ते 3 लाख रुपये आहे. तर हनीमून सूटचे भाडे प्रति रात्र 7.5 लाख रुपये आहे.