टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या महामुकाबल्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तान क्रिकेट टीमबद्दल मोठं विधान केलं आहे. तसेच हार्दिक पंड्याबाबतही त्याने माहिती दिली आहे. टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यासाठी पाकिस्तानने 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या 12 पैकी 11 जणांची घोषणा ही सामन्याआधी केली जाणार आहे. तर टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार, याकडेही भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
October 23, 2021
विराट काय म्हणाला? पाकिस्तान उत्तम संघ आहे. पाकिस्तान नेहमीच मजबूत संघ राहिला आहे. आम्ही पाकिस्तानला गृहीत धरु शकत नाहीत. तसेच या सामन्यात आम्ही ज्या प्रकारे खेळू त्याच प्रकारे इतर संघाविरुद्ध खेळू. आमच्यासाठी रेकॉर्ड्स महत्त्वाचे नाहीत. तसेच टीम म्हणून आम्ही याकडे जास्त लक्ष देत नाहीत, असं विराटने नमूद केलं. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विराट बोलत होता.
हार्दिकबाबत काय म्हणाला? विराटने या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान त्याने हार्दिक पंड्याबाबतही माहिती दिली. पंड्या दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ बॉलिंग करत नाहीये. हार्दिक आधीपेक्षा जास्त दुखापतीतून सावरला आहे. हार्दिक आता फीट आहे. हार्दिक टीमसाठी प्रत्येक सामन्यात 2 ओव्हर टाकू शकतो. आम्ही त्याच्या बॉलिंगबाबत फार चिंता करत नाहीयेत, असंही विराटने स्पष्ट केलं.
अशी आहे पाकिस्तानची 12 सदस्यीय संघ : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफरीदी, हसन अली, हरीस रऊफ आणि हैदर अली.