केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी न्यूज चॅनल संसद टीव्हीला एक खास मुलाखत दिली आहे. यावेळी शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुणापासून ते त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आयुष्यातील तीन महत्वाचे आणि तेवढेच आव्हानात्मक टप्पेही सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील तीन महत्वाची आव्हानं - संसद टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले, 'मोदीजींचे सार्वजनिक जीवन तीन भागात विभागले जाऊ शकते. पहिला भाग - भाजपत आल्यानंतर संघटक म्हणून. दुसरा भाग - गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि तिसरा भाग - राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान म्हणून. त्यांनी गुजरातचे संघटन मंत्री म्हणून, एका पक्षाची विश्वासार्हता सामान्य जनतेच्या मनात कशा प्रकारे निर्माण केली जाऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण स्थापित केले आहे. ते संघटनमंत्री झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच गुजरात भाजपचा प्रवास सुरु झाला.
1990 मध्ये आम्ही युती करून सरकारमध्ये आलो. ती 50 टक्क्यांची भागीदारी होती. मात्र, 1995 मध्ये आम्ही संपूर्ण बहुमताने निवडून आलो आणि तेथून भाजपने आजपर्यंत कधीही मागे वळून पाहिले नाही.
समस्या येतात, त्या भविष्यातही येतील - 'मोदीजींच्या यशस्वी मुख्यमंत्रीपदाच्या काळात, केवळ गुजरातमध्येच नाही, तर देशभरात आशेचा एक किरण जागृत झाला, की बहुपक्षीय लोकशाही व्यवस्थेत कोणताही दोष नाही. ती यशस्वी होऊ शकते आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंतही जाऊ शकते. समस्या येतात, त्या भविष्यातही येतील. पण आज मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून, समस्येचे तत्काळ निराकरण केले जाते, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि संवेदनशीलतेने त्या सोडविल्या जातात, असेही अमित शाह म्हणाले.
नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? - पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, 'मी त्यांना अगदी जवळून काम करताना पाहिले आहे. हे सर्व लोक जे आरोप करतात, ते पूर्णपणे निराधार आरोप आहेत. मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कुठलीही बैठक असो, ते किमीत कमी बोलतात, अतिशय संयमाने ऐकतात आणि नंतर योग्य तो निर्णय घेतात. कधी-कधी तर आम्हालाही वाटते, की एवढा विचार सुरू आहे. पण ते प्रत्येकाचे ऐकतात आणि गुणवत्तेच्या आधारावर लहानातल्या लहान व्यक्तीच्या सूचनेलाही महत्त्व देतात. त्यामुळे, ते निर्णय लादणारे नेते आहेत, असे म्हणणे, यात काहीही तथ्य नाही.