बेळगाव ता. रायबाग : कृष्णा नदीवर असलेल्या कुडची (ता. रायबाग) येथील पुलावर 23 जुलैला पाणी आले होते. त्यामुळे जमखंडी-सांगली मार्गावरील आंतरराज्य वाहतूक बंद झाली होती. परिणामी सुमारे 40 किलो मीटर फेऱ्याने वाहनाधारकांना प्रवास करावा लागला. अखेर आज बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास 13 दिवसांनी पाणी ओसरल्याने कुडची पूल खुला झाला आहे.
कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणीपातळी स्थिर होती. त्यामुळे नदी काठावरील गावांना चिंता लागली होती. धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले होते. कुडची पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी बंदोबस्त ठेवला होता. आता पूल खुला झाल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्याने आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या कु़डची पुलावर पाणी होते. त्यामुळे जमखंडीहून सांगलीला हारूगेरी क्राॅस, अथणी, कागवाडमार्गे सुमारे 40 किलो मीटर फेऱ्याने तर रायबागहून अंकली, मांजरी, कागवाडमार्गे 30 किलो मीटर फेर्याने जावे लागले. आता रस्ता खुला झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.