बेळगाव ता. निपाणी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक सीमेजवळ असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना सोडण्याची मागणी कागलमधील (कोल्हापूर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. सीमा तपासणी नाक्यावरील अधिकार्यांकडे ही मागणी करण्यात आली. बुधवारी मोर्चाद्वारे येऊन मागणीच्या पूर्ततेसाठी तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भैय्या माने म्हणाले, कर्नाटकालगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचा निम्मा भाग हा कर्नाटकाशी संलग्न असून त्यांना कर्नाटकातून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. यासाठी येथील तपासणी नाक्यावरून गडहिंग्लज, आजरा, चंदगड, उत्तूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन सोडावे. येत्या तीन दिवसात निर्णय न झाल्यास कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहने अडवण्यात येतील.
सीमा तपासणी नाक्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, अमर चंदनशिवे, कागल तालुका पंचायत सभापती रमेश तोडकर, संजय चितारी, संजय ठाणेकर, सौरभ पाटील, अर्जुन नाईक, बच्चन कांबळे, आनंदा पसारे, सतीश घाडगे, सुनील माळी, सागर गुरव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, युवक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.