विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत निशाणा साधला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीत विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहीचा आणि लोकांचा अपमान आहे असं म्हटलं आहे. पेगॅसस, करोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसंच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नरेंद्र मोदींनी संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे.
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा साधत खासदारांना लोकं आणि मीडियासमोर त्यांना उघडं पाडत सत्य मांडण्यास सांगितलं होतं. एकीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विरोधकांना एकत्र आणत ब्रेकफास्ट बैठक घेतली असतानाच मोदींनी ही टीका केली आहे. यानंतर काँग्रेसकडून इतर पक्षांसोबत संसदेपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी वाढत्या इंधनदराविरोधात निषेध करण्यात आला.