बेळगाव ता. निपाणी : महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोगनोळी, अथणी आणि कागवाड सीमा तपासणी नाक्यावर कडक तपासणी करण्यात येत आहे. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवून 39 वाहनातून 114 कर्नाटकात प्रवेश घेतला. येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी महाराष्ट्रातून व इतर राज्यातून कर्नाटकात जाणाऱ्या मालवाहू गाड्यांमध्ये प्रवासी असल्यास त्यांनाही परत पाठवण्यात येत आहे.
या ठिकाणी कर्नाटक महामंडळाच्या बसेस व खाजगी बसेस मधील प्रवासी यांचे देखील आरटीपीसीआर रिपोर्ट तपासणी करण्यात येत आहेत. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणाऱ्या खाजगी बसेसना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड उत्तुर जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी आधार कार्डपाहून सोडणे बंद करण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना अन्यत्र ठिकाणाहून जावे लागत आहे. या ठिकाणी असणारा कर्नाटक सीमा तपासणी नाका मंगळवारपासून दुधगंगा नदीच्या पुलाजवळ सुरू होणार असून त्या ठिकाणी तपासणी करूनच कोगनोळी फाट्यावर सोडण्यात येणार आहे. पुन्हा प्रवाशांची रिपोर्ट तपासणी करून नोंदणी करून त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी दिली.
महाराष्ट्रात जाणाऱ्या व परत कर्नाटकात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांना आरटीपीसीआर रिपोर्ट सक्तीचा केला आहे. यामुळे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. निपाणी मंडल पोलीस निरीक्षक, एस व्ही शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, साहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी यांच्यासह 30 हून अधिक पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी शिक्षक जे डी, पाटील, आर बी बडगेर, ए एम कुंभार, आरोग्य सेविका प्रीती घागरे, सुवर्णा प्रधानी, आशा कार्यकर्त्या माया पाटील, मंगल संकपाळ उपस्थित होत्या.
कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. ते नसल्याने बससह प्रवाशांना महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. अथणी व कागवाड तालुक्यात सांगली, मिरज, जत, कवठेमहांकाळला जोडणाऱ्या रस्त्यांवर परत सीमा तपासणी नाके उभारले आहेत. महाराष्ट्रातील सीमाभागात वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वी दोन लस घेतलेल्यांना अहवालाशिवाय राज्यात प्रवेश दिला जात होता. आता हा नियम बंद करण्यात आला आहे. दोन लस घेतली तरी केरळ व महाराष्ट्रातून येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
सांगली, मिरजहून येणारी वाहने आरटीपीसीआर प्रमाणपत्र नसल्यास परत पाठविण्यात येत आहेत. कागवाड सीमा तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. कडक निर्बंध लादण्याची देताच महाराष्ट्राच्या सीमेवर खबरदारी वाढविण्यात आली असून आरटीपीसीआर तपासणी अहवाल नसलेल्या प्रवाशांना त्यांच्या वाहनासह माघारी धाडण्यात येत आहे. रविवारी मिरजेहून प्रवाशांना घेऊन कर्नाटकात येणारी बस अथणी पोलिसांनी मंगसुळीजवळ अडविली. कोणत्याही प्रवाशाकडे आरटीपीसीआर अहवाल नव्हता. त्यामुळे बससह प्रवाशांना माघारी पाठविण्यात आले.