बेळगाव : महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमधील लोकांच्या मदतीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगावच्यावतीने मदत संकलन केंद्र छत्रेवाडा येथे उभे करून बेळगाव मधील जनतेला मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच नागरिकांचा या मदत केंद्राला भरभरून मदत मिळत गेली. मंगळवार 27 जुलै ते शनिवार 31 जुलै पर्यंत हे मदतकार्य सुरु होते. आणि शनिवारी संध्याकाळी चिपळूण, रत्नागिरी, सातारा याठिकाणी पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी 2 गाड्या रवाना करण्यात आल्या.
4 सदस्य कुटुंबाना 20 दिवस पुरेल इतका धान्यसाठा, साबण, पेस्ट, तेल, ब्लॅंकेट, 1 साडी तसेच सॅनिटरी पॅड व औषधी साहित्य असे 400 किट तयार करण्यात आली. गेले 4 दिवस शेकडो कार्यकर्ते जिल्हाप्रमुख श्री किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून उस्फुर्त मदत मिळाली. यावेळी छत्रेवाडा येथे छत्रे गुरुजी यांच्या हस्ते या किटचे पूजन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जिल्हाप्रमुख यांनी मार्गदर्शन केले. गुरुजींच्या आज्ञेनुसार आणि श्री शिवाजी महाराज, श्री संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन 'मदत नाही कर्तव्य या भावनेतून हे काम आपण केले आहे.
यासाठी बेळगावकर नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आणि यापुढेही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रत्येक कामात आपण साथ द्यावी अशी भावना व्यक्त केली. यावेळी गाडीचे पूजन करून हा मदतरथ पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी मिळून हे कार्य पूर्णत्वास नेले.