बेळगाव : अथणी तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कृष्णाकाठावर असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. यातच तालुक्यातील सवदी येथील पाण्याच्या प्रवाहात सोमवारी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रामगोंडा सिद्धगोंडा पाटील (वय 55) असे त्यांचे नाव आहे. शेतातून जनावरांसह स्थलांतरीत होताना पाण्याच्या प्रवाहात अडकून त्यांचा मृत्यू झाला.
एनडीआरएफची तुकडीने मृतदेहाचा मंगळवारी शोध घेतला. मयताच्या मागे आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. कृष्णेच्या पुराचा अथणी तालुक्यातील वीस गावांना फटका बसला आहे. 2005, 2019, 2021 या तीन वर्ष तालुक्याला फटका बसला आहे. यंदा सर्वात जास्त महापूर आला आहे. आठ ठिकाणी गंजीकेंद्रे सुरु केली आहेत. पूरग्रस्तांना अनेक संघ, संस्थाकडून मदत दिली जात आहे. नंदेश्वर, दर्गा, महेशवाडगी, जनवाड, सत्ती, दोडवाड, नांगनूर-पीके, औरवाड, तंगडी, शिनाळ, तीर्थ, सप्तसागर या गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे.