बेळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान प्रवासी वाहतुक व सरकारी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. coronavirus चा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून 24 मेपर्यंत संपूर्ण Lockdown केले आहे. तरीही अनेकजण दुचाकीवर फिरताना दिसतात. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पहिल्याच दिवशी शहरात 140 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर विनामास्क फिरणार्या 230 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात आला आहे.
दुचाकी जप्त करून लॉकडाऊन उठल्यानंतर संबंधित वाहनचालकांना त्यांची वाहनं परत दिली जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त डाॅ त्यागराजन यांनी दिली. दुचाकीस्वारांना पकडल्यानंतर त्यांना जर योग्य ‘कशासाठी बाहेर पडलो’ याचे स्पष्टीकरण देता आले नाही तर ती दुचाकी पोलीस जप्त करत आहेत. बेळगाव जिल्ह्यात जागृती करूनही रस्त्यावर फिरणार्या नागरिकांना चौका-चौकात उभारलेल्या पोलिसांनी चांगलेच फटके दिले. मास्क न घालणार्यांना काठ्यांचा प्रसाद देऊन त्यांना रूमाल किंवा मास्क बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
YouTube Video पाहाWatch YouTube Video
जीवघेण्या CoVID-19 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटकात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनाही बंद आहेत. कोरोनाबाबत प्रशासन जागृती करीत आहे. मात्र, अद्यापही अनेकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. जीवनावश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले.
वाहतूक पोलिस शाखेच्या कर्मचार्यांनी दुचाकीस्वारांची चौकशी करून चांगलेच फटके दिले. शिवाय चारचाकी वाहने, दुचाकीस्वारांनाही चोपून काढण्यात आले. विशेषत: आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेकजण रस्त्यावर फिरताना मास्क किंवा हातरूमाल तोंडाला न बांधता फिरताना दिसून आले. अशांची फिरकी घेत पोलिसांनी त्यांनाही दक्षतेबाबत सूचना दिल्या.
लॉकडाऊनचा आदेश असतानाही विनाकारण बाहेर फिरणार्यांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे पोलीस खात्याने गंभीर पाऊले उचलली आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने वेळ निर्धारित केली आहे. या वेळेतच तसेच सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र या सूचनेचेही उल्लंघन होताना दिसत आहे. अत्यावश्यक दुकानं सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत अर्थात 4 तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नियम न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरात विनाकारण, विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई चालू असून, नागरिकांनी नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल.
- डाॅ के त्यागराजन, पोलीस आयुक्त, बेळगाव