देशात दर दिवशी कोरोनाचे तीन-चार लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. अनेक राज्यांमध्ये नव्या रुग्णांचा आलेख वाढताच आहे. या परिस्थितीचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. देशव्यापी नाही; पण 26 राज्यांत लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता तामिळनाडूचाही समावेश झाला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी 10 मेपासून दोन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊनची घोषणा केली.
इतक्या राज्यांत लॉकडाऊन लागला असला तरी केंद्र सरकार संपूर्ण देशात तो लावणार नाही. कर्नाटक आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर परिस्थिती बिघडल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत 26 राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलेला नसला, तरीही देशातील बहुतांश भागात लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.
देशात सध्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे, तर महाराष्ट्र, गुजरात, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनप्रमाणेच रात्रीची संचारबंदी, तसेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
लॉकडाऊन लावण्यात आलेल्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर परिस्थिती बिघडल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांनंतर या राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर तेथील परिस्थिती बिघडली, तर उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली.
देशात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद महाराष्ट्रात होत आहे. त्यानंतर कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक आहे. केरळमध्येही 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. कर्नाटकमध्येही आकडा 50 हजारांवर पोहोचला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वगळता दक्षिणेकडील तीनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाऊन आहे. उत्तर भारतात जम्मू आणि काश्मीर, तसेच उत्तराखंड वगळता सर्वच राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.