बेळगाव : कोरोना नियंत्रणात केंद्राबरोबर राज्य सरकारही अपयशी ठरले आहे. मृतांची संख्या वाढतच आहे. कुठे आहेत अच्छे दिन ? आम्हाला अच्छे दिन नकोत. 2013 मधील दिवस हवे आहेत, असे जनता म्हणत आहे. कोरोना नियंत्रणात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरले आहेत. देशामध्ये गल्लोगल्लीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. हेच काय ते अच्छे दिन? असा संतप्त सवाल प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकार सर्वच बाबतीत राज्यावर अन्याय करीत करीत आले आले आहे. जीएसटी, महापुरावेळी नैसर्गिक आपत्ती निधी वितरणात अन्याय केला आहे. आता ऑक्सिजन पुरवठ्यात अन्याय करत असल्याचा आरोप आ. हेब्बाळकर यांनी केला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करा, असे उच्च न्यायालय सांगत असले तरी केंद्र स्थगिती मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे जाते. राज्यातील 26 खासदार करीत आहेत तरी काय...? आणीबाणीचा प्रसंग हाताळता येत नसेल तर हे खासदार काय कामाचे...? राजीनामा देऊन घरी जावे, अशी टीका आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्याची प्रतीक्षा जनता अद्याप करत आहे. आता दुसरी लाट आली असून तिसरीही येणार आहे. मात्र, पॅकेजसंदर्भात केंद्र सरकार अवाक्षर काढत नाही. कर्नाटकात तर कुणाचा पायपोस कुणाला नाही. कोरोना कर्फ्यू हास्यास्पद विषय ठरला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांनी गांधी कुटुंब, काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली होती. आता संकटावेळी ते कुठे आहेत, असा प्रश्न आ. हेब्बाळकर यांनी विचारला आहे.
कोणत्या मंत्र्याकडे कोणती जबाबदारी आहे. कोणता मंत्री काय करतो आहे, हेच समजून येत नाही. बेळगाव जिल्ह्यात चार मंत्री आहेत. यातील एकही प्रबळ नसल्यानेच परजिल्ह्याला पालकमंत्री दिल्याचा टोलाही आमदार हेब्बाळकर यांनी मारला आहे. मंत्री गोविंद कारजोळ यांच्याबाबत आपल्याला आदर आहे. पण, त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती नाही. ते मूळचे बागलकोटचे असल्याने बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून ते कसे कामकाज करणार हा प्रश्नच असल्याचे आ. हेब्बाळकर यांनी म्हटले आहे. कोरोनाने मृत झालेल्यांच्या बाबतीतही आता राजकारण सुरू झाले आहे. कर्नाटकात लॉकडाऊन, कोरोना कर्फ्यूचा फज्जा उडाला आहे.