कोरोनाची दुसरी लाट भारतात एवढा मोठ्या वेगाने का पसरली याचे कारण समोर आले आहे. पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये तयार झालेल्या अंटिबॉडीने तारले होते. कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये तयार झालेली अँटिबॉडी संपली आहे. जवळपास 93 टक्के लोकांमध्ये पाच महिनेच अंटिबॉडी होती. आता फक्त 7 टक्के लोकांमध्येच ही अँटिबॉडी शिल्लक आहे. काशीच्या हिंदू विश्वविद्यालय़ाच्या (बीएचयू)मध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय जर्नल सायन्समध्ये जागा मिळाली आहे. देशात अचानक कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर का पसरली या कारणाचा बीएचयूचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या टीमने वाराणसीच्या लोकांचा अभ्यास केला.
यामध्ये असे आढळून आले की, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-नोव्हेंबर काळातील सीरो सर्व्हेमध्ये ज्या 100 लोकांमध्ये 40 टक्के अँटीबॉडी होती, त्यांच्यात पाच महिन्यांनी म्हणजेच यंदाच्या मार्च पर्यंत केवळ 4 टक्केच अँटीबॉडी शिल्लक राहिली आहे. यामध्ये सात लोक असे मिळाले आहेत ज्यांच्यात पूर्ण अँटिबॉडी आहे. प्रो. ज्ञानेश्वर यांनी सांगितले की, सीरो सर्व्हेच्या वेळी असा अंदाज लावण्यात आला होता की, ज्या लोकांमध्ये अंटिबॉडी मिळाली आहे ती सहा महिने टिकेल. मात्र, तसे झाले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. तसेच त्यांच्यात बनलेली अँटीबॉडी ही नाममात्र होती.
आधीच्या अंदानुसार जून 2021 पर्यंत लोकांच्या शरिरात अँटिबॉडी असतील व कोरोनाची दुसरी लाट ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता होती. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील पूर्ण झाले असते. हा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजविला आहे, असे ते म्हणाले. आता वैज्ञानिकांनी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत हर्ड इम्युनिटी विकसित होणार नाही, असा अंदाज लावला आहे. अशावेळी कोरोनाशी लढण्यासाठी लसच मुख्य शस्त्र असल्याचे ते म्हणाले. वैज्ञानिकांची टीम लसीकरण केलेल्या लोकांवर संशोधन करत आहे. जे लोक कोरोना संक्रमित नव्हते, आणि ज्यांनी लस घेतली त्यांना अँटिबॉडी विकसित होण्यास चार आठवड्यांचा अवधी लागला. मात्र, ज्यांना कोरोना झाला होता, त्यांच्यामध्ये आठवडा किंवा दहा दिवसांतच अँटिबॉडी बनली, असे ते म्हणाले. गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोनाचे 4 लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींचा हा विक्रम मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी : गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने 4 लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 3 हजार 738 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 92 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 86 हजार 444 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्या आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.
आतापर्यंतची आकडेवारी : आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण –4,03,738
मृत्यू – 4,092
डिस्चार्ज – 3,86,444
एकूण रुग्ण – 2,22,96,414
एकूण मृत्यू – 2,42,362
एकूण डिस्चार्ज – 1,83,17,404
एकूण अँक्टिव्ह रुग्ण – 37,36,648
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 16,94,39,663