बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपची पारंपरिक मराठा मते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पारड्यात गेल्याने भाजपचे मताधिक्य घटल्याचे बेळगाव दक्षिणचे भाजपा आमदार अभय पाटील यांनी मान्य केले. काही प्रमाणात भाजपला यावेळी मराठी भाषक मतदारांनी दूर ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळेच गेल्यावेळी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना मिळालेले मताधिक्य यावेळी घटले आहे. तसेच यावेळी मराठी भाषक भक्कमपणे समितीच्या पाठीशी उभे राहिल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. समितीच्या मतांमुळेच भाजपचे मताधिक्य 4 लाखाहून अवघ्या 5 हजारांवर आल्याचे आमदार अभय पाटील यांनी मान्य केले आहे.
मणगुत्ती आणि पिरनवाडी प्रकरण तसेच कन्नड संघटनांकडून मराठी भाषकांना सातत्याने डिवचले जात असतानाही भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत आवाज उठविला नाही. तसेच महापालिकेसमोर लावलेला अनधिकृत लाल पिवळा ध्वज हटविण्याबाबतही भूमिका घेतली नाही. त्यामुळे, मराठी भाषकात राष्ट्रीय पक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेरीस मराठी भाषकांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत समितीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.
मराठी मतांच्या जोरावरच भाजपला दरवेळी मोठे मताधिक्य मिळत होते. गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत अंगडी यांना तब्बल चार लाखांचे मताधिक्य मिळाले होते. यामध्ये त्यामध्ये त्यात बेळगाव दक्षिण, ग्रामीण व उत्तरच्या मतदारांचा मोठा वाटा होता. यावेळी मराठी मतदार आपल्या मागे उभे राहतील, असे भाजपकडून गृहीत धरलेजात होते. मात्र, म. ए. समितीच्या शुभम शेळके यांनी लाखाहून अधिक मते घेऊन आजही येथील जनता समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी एकाकी झुंज देत तब्बल 1 लाख 17 हजार यावर मते मिळवली.
मतांचे विभाजन झाल्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा विजय कमी मताधिक्याने झाला. पक्षाची पारंपारिक मराठा मते एकीकरण समितीकडे गेली. भविष्यात मराठा मतांचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असे आमदार अभय पाटील म्हणाले. तसेच बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीचा परिणाम येणार्या महापालिका आणि जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणूकीत होणार नाही या निकालांचा भविष्यातील निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या निवडणुकांच्या निकालावर सविस्तर चर्चा केली जाईल असे आमदार अभय पाटील म्हणाले.