संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने 200 हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे. मात्र ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपाने सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसंच निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला आहे.
ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. नंदीग्राममध्ये त्यांचा 1622 मतांनी पराभव झालाय. ममतांनीही पत्रकार परिषदेत नंदीग्राममधील त्यांचा पराभव मान्य केलाय. पश्चिम बंगालमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कोरोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नव्हता. राज्यात 84 लाख 77 हजार मतदार असून 80 टक्के मतदान झालं. ममता बॅनर्जी गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.
बंगालचं चित्र स्पष्ट, मात्र नंदीग्रामचं नाही : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाची हॅटट्रिक झाली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपा सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.
नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करा; ममता बॅनर्जींची मागणी : ममता बॅनर्जी यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नंदीग्राममध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींवरुन त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग सूडाने वागत असल्याची टीका त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना केली आहे. निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्रास दिला जात असून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली असल्याचं सांगितलं आहे.
मोदींकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन : पश्चिम बंगालमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगालमधील लोकांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसंच करोना संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.