बेळगाव ता. खानापूर : खानापूर तालुक्याच्या भीमगड अरण्य व्याप्तीच्या दुर्गम भागातील अबनाळी गावातील 144 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनबरोबरच या गावकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टीने श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने जीवनोपयोगी साहित्याचे गावात वितरण केले. ग्रुपचे अध्यक्ष श्री विठ्ठल हलगेकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यावेळी सीपीआय सुरेश शिंगी यांच्यासह महालक्ष्मी ग्रुपचे कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी या गावात सर्दी, पडसे, ताप, जुलाबाची साथ आली होती. त्यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने अबनाळीला भेट देऊन सर्वांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे दिली. त्यावेळी गावातील एकूण 240 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 144 जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. कोरोना लागण झालेले सर्व गावकर्यांची तब्येत ठणठणीत आहे आणि कोरोनाची तीव्रता तितकी नसली तरी खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने संपूर्ण गाव बंद केले. तसेच रुग्णांवर गावातच उपचार सुरू ठेवत त्याठिकाणी संचारबंदी केली. परिणामी गावात जीवनोपयोगी साहित्याचा तुटवडा भासू लागला. याची दखल घेत बेळगाव गावाला मदत करण्यात आली.
आठवड्यापूर्वी गावातील एका जुन्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरल्याने गावातील बर्याच लोकांना ताप व सांधेदुखीचा त्रास झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आरोग्य खात्याने जवळपास 250 जणांची तपासणी व त्यांच्यावर उपचार केले होते. आता ते सर्वजण या आजारातून बरेही झाले आहेत. पण त्यावेळी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तब्बल 15 दिवसांनी मिळाला. त्यामध्ये 144 जण पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. गावात मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, शुद्ध पाणी पिणे तसेच दिलेली औषधे घेऊन कोरोनावर मात करण्याचा सल्ला अधिकार्यांनी गावकर्यांना दिला आहे.