अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान समर्पण निधी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान मिळेलेले तब्बल 15 हजार चेक बाऊन्स झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या चेकचं मूल्य 22 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनंदेखील माहिती दिली आहे. हे चेक बाऊन्स होण्यामागे तांत्रिक कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं. मोठ्या प्रमाणात चेक बाऊन्स झाल्यामुळे तसंच यामागे काही तांत्रिक कारण असल्याचं समोर आल्यानंतर यासंदर्भात एक टीम तयार करण्यात आली आहे.
ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत त्यांच्याशी ही टीम संपर्क साधणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्र यांच्यानुसार हे चेक बाऊन्स होण्यामागे तांत्रिक कारण आहे. ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत त्यापैकी काही जणांनी नवे चेक दिले आहे आणि त्यापैकी काही क्लिअरही झाले आहेत. तर अन्य लोकांशी संपर्क साधला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
2500 कोटी जमल्याचा अंदाज : राम मंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशात समर्पण निधी मोहीम चालवण्यात आली होती. यादरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी घराघरांत जाऊन निधी गोळा करण्यात आला होता. याद्वारे जमा करण्यात आलेली रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती.
यादरम्यान, समन्वयासाठी 49 नियंत्रण केंद्र उभारण्यात आले होते. तर दिल्लीत मुख्य केंद्रावर चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या देखरेखीखाली 23 जणांच्या टीमनं संपूर्ण भारतातून जमा झालेल्या रकमेवर आणि डिपॉझिट करण्यात आलेल्या रकमेवर लक्ष ठेवलं. निधी समर्पण मोहिमेदरम्यान 4 मार्चपर्यंत 2500 कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.